Thursday, 14 May 2020

लेखांक-12

लेखांक-1⃣2⃣

💢 इयत्ता 10 वी
*विज्ञान भाग 2 : स्वअभ्यास*

प्रकरण 1 : *आनुवंशिकता व उत्क्रांती*
★★★★★★★★★

*फक्त वाचा व चिंतन करा*

■ *बिग बँगच्या सिद्धांतानुसार* विज्ञान आपल्याला सांगते की, अगणित सूर्यानी बनलेल्या आपल्या विश्वाचे वय सुमारे तेराशे कोटी वर्षे असून, त्यात आपला सूर्य सुमारे फक्त ५०० कोटी वर्षांपूर्वी निर्माण झालेला आहे. 

■ त्यानंतर म्हणजे सुमारे ४६० कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीच्या जन्मदात्या हय़ा सूर्यापासून आपली पृथ्वी बनलेली आहे, पण तेव्हा ती एक अतिउष्ण जळता गोळा होती. ती थंड आणि जलमय व्हायला सुमारे शे-सव्वाशे कोटी वर्षे लागली. *सुमारे साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर कोणत्याच प्रकारचे जीवन अस्तित्वात नव्हते.

■ नंतर केव्हा तरी म्हणजे सुमारे तीन-साडेतीनशे कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर कुठे तरी काही रासायनिक प्रक्रिया निसर्गत: होऊन आधी (अल्गी) शेवाळ व नंतर केव्हा तरी अगदी साधे अमिबा, बॅक्टेरियासारखे जिवाणू किंवा एकपेशी सजीव निर्माण झाले. 

■ नंतरची सुमारे दोनशे कोटी वर्षे पृथ्वीवर फक्त असलेच प्राथमिक अवस्थेतील सजीव होते. तेव्हा आजच्यासारखी जंगले किंवा पशू-पक्षीसुद्धा पृथ्वीवर नव्हते. 

■ नंतर सुमारे साठ कोटी वर्षांपूर्वीपासून सुमारे वीस कोटी वर्षांपूर्वीपर्यंत पृथ्वीवर बहुपेशीय पण कमी गुंतागुंतीची शरीरे असलेल्या सजीवांचे ‘प्राचीन जीवयुग’ होऊन गेले. त्यालाच आपण *पुराजीव महाकल्प* असे संबोधले आहे.

■ पुढे वीस कोटी वर्षांपूर्वीपासून ते पाच कोटी वर्षांपूर्वीपर्यंत पृथ्वीवर सरपटणारे प्राणी व वेगवेगळे डायनॉसॉर आणि अनेक वनस्पती वगैरेंचे 'मध्यजीवयुग’ होऊन गेले. याला आपण *मध्यजीव महाकल्प* असे संबोधले आहे. याचदरम्यान सुमारे 7 कोटी वर्षांपूर्वी अखेरचे डायनोसॉर नाहीसे झाले.

■ त्यानंतर हय़ा शेवटच्या पाच कोटी वर्षांपूर्वी आज जगात दिसणाऱ्या सस्तन प्राण्यांचे ‘नवजीवयुग’ म्हणजेच *नवजीव महाकल्प* सुरू झाले. 

■ हय़ाच नवजीवयुगात सुमारे चारकोटी वर्षांपूर्वी, मानवाचा पूर्वज असलेला बिनशेपटीचा, चतुष्पाद असलेला, पण दोन पायांवर चालण्याचा प्रयत्न करू लागलेला ‘मानव-पूर्वज-मर्कट’ पृथ्वीवर वावरत होता. हय़ाचे पुरावे शास्त्रज्ञांनी केलेल्या उत्खननात मिळालेले आहेत.
हीच वन्यप्राणी असलेली मर्कट जात शेवटची एक सव्वा कोटी वर्षे उत्क्रांत होत राहिलेली आहे. ती जात मागील दोन पायांवर, पण जरा पुढे वाकून चालू लागली व पुढील दोन पायांचा हातासारखा उपयोग करू लागली. उदाहरणार्थ, झाडावर चढताना फांद्या धरायला, जमीन खरवडून कंदमुळे खाण्यासाठी काढायला किंवा बीळ खणून लहानसहान प्राणी पकडून खायला किंवा झाडांच्या फांद्यांचा वा प्राण्यांच्या हाडांचा काठीसारखा हत्यार म्हणून उपयोग करायला वगैरे. हय़ा *उत्क्रांतीत त्याला निसर्गनियमाने तीन महत्त्वपूर्ण गोष्टी प्राप्त झाल्या.* एक म्हणजे हाताचा आकार बदलला व एका बोटाचा अंगठा बनला, जो इतर बोटांना टेकवता येऊ लागला. *दुसरे* म्हणजे कंठ थोडा उत्क्रांत  होऊन तो वेगवेगळे आवाज काढू लागला. ज्यातून पुढे ‘काही शब्द’ आणि नंतर ‘भाषा’ निर्माण झाली व *तिसरे* म्हणजे हाताने अन्नाचे लहान तुकडे करून खाणे शक्य झाल्यावर, त्याला मोठय़ा जबडय़ाची गरज उरली नाही, त्यामुळे जबडा लहान होऊ लागल्याने डोक्यात मेंदूची वाढ व्हायला जागा निर्माण झाली व तशी मेंदूची वाढ क्रमश: होऊ लागली.

■ नंतर अवघ्या दहा-पंधरा लाख वर्षांपूर्वी हय़ा *ऑस्ट्रेलोपिथिकस आणि रामापिथिकस किंवा ज्याला दाक्षिणात्य वानर* असेही म्हणतात, त्याच्यापासून दोन पायांवर सरळ ताठ चालू शकणारा आदिमानव *(होमो इरेक्टस)* निर्माण झाला आणि 

■ त्यानंतर आजपासून अवघ्या दीड-दोन लाख वर्षांपूर्वी ‘होमो सॅपियन’ ऊर्फ ‘शहाणा मानव’ ही आजची मानवजात निर्माण झालेली आहे व त्याचीही उत्क्रांती होतच आहे. आदिमानव असतानाच तो हाताने दगडांपासून साधीसुधी हत्यारे बनवायला शिकला. जंगलात किंवा उघडय़ावर एकटय़ादुकटय़ाने स्वसंरक्षण करून राहण्यापेक्षा तो माणसांच्या टोळ्या व नंतर संघसमाज बनवू लागला, घरे बांधू लागला, समाजात एकमेकांशी संवाद साधण्यासाठी त्याच्या आवाजाचे काही शब्द व हळूहळू त्याची भाषा बनू लागली. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की त्याचा मेंदू वाढू शकल्याने तो विचार करू लागला. भाषा आणि मेंदू एकमेका साहाय्य करू लागले. स्मृती वाढली, विचार वाढले, आता काय झाले पाहा. मूलत: वन्य -प्राणी असलेला आदिमानव, उत्क्रांतीच्या त्याच्या पुढच्या पायरीवर तो आता स्वत:च्या हाताने स्वत:च आपली हत्यारे बनवू शकणारा, विचार करू शकणारा, एकमेकांशी गुंतागुतीचे संवाद भाषेद्वारे करू शकणारा, स्वत:ची घरे बांधू शकणारा, पशुपालन करणारा व नंतर मानवरूपात येऊन काही हजार वर्षे जीवन जगल्यावर 
शेवटच्या दहा-बारा हजार वर्षांत शेती करून धान्योत्पादन करून ते साठवूनही ठेवू शकणारा, *हुशार मानव* बनला. 

■ हय़ा इतक्या कुवती प्राप्त झाल्यामुळे ही द्विपाद मनुष्यजात पृथ्वीवरील इतर सर्व पशू-पक्ष्यांशिवाय वरचढ ठरली, समर्थ ठरली. बिनशेपटीच्या एका मर्कट जातीपासून अनेक टप्प्यांनी अखेर आजची बुद्धिमान, शहाणी, कुशल व सुसंस्कृत मानवजात बनायला त्याला एक-सव्वा कोटी वर्षांचा दीर्घ काळ मात्र घ्यावा लागला हे खरे. 

■ याचा अर्थ असा होतो की ४६० कोटी वर्षांपूर्वी पृथ्वी निर्माण झाल्यापासून, सुमारे ४५९ कोटी वर्षेपर्यंत मानवच नव्हे तर मानवाचा कुणी पूर्वजही पृथ्वीवर नव्हता. म्हणजे मानव नवागत आहे, आदिमानवरूपात अवघ्या दहा-पंधरा लाख वर्षांपूर्वी व शहाण्या मानवरूपात तो पृथ्वीवर अवघ्या दीड-दोन लाख वर्षांपूर्वी आलेला आहे.

■ मानव पृथ्वीवर विकसित झाला की बाहेरून आला हा आजही चर्चेचा विषय आहे. तरीही आपण आधुनिक वैज्ञानि क साधनांच्या सहाय्याने मानववंशाच्या मुळांच्या तपशिलाचा शोध घेतच आहोत. 

 ■■■
आज स्वाध्याय नाही. मात्र या माहितीच्या अनुषंगाने घरी चर्चा करा. 

...✍
*श्रीशैल मठपती,* कोल्हापूर

💢Ⓜ💢Ⓜ💢Ⓜ

No comments:

Post a Comment